जळगाव : प्रतिनिधी
गांधी रिसर्च फाउण्डेशन गांधी तीर्थच्यावतीने महात्मा गांधीजींच्या ७३ व्या पुण्यतिथी निमित्त आज दि. ३० जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता महात्मा गांधी उद्यानात भावांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याहस्ते होत आहे.त्यात प्रामुख्याने महात्मा गांधीजींच्या
अंतिम यात्रेच्या ऐतिहासिक घटनेवर आधारीत अधिकृत संदर्भ असलेले गांधी रिसर्च फाउंडेशनचे विशेष चित्र प्रदर्शन, जे ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान नागरिकांना विनामूल्य पाहता येईल तसेच दि.३० रोजी सायंकाळी साडेसहा ते रात्री नऊ दरम्यान् गांधीजींची अंतिम झलक आणि विश्वातील प्रसिद्ध व्यक्तींनी महात्माजींना दिलेली श्रद्धांजली अशी हिंदी व इंग्रजीची …द लास्ट जर्नी’ डॉक्युमेंटरीचे सहा शो देखील दाखविले जाणार आहेत.
बदलत्या जीवनशैली व सध्याच्या काळात देखील महात्मा गांधीजी यांचे विचार शाश्वत आहेत. संकटाची परिस्थिती सुरु आहे. मात्र हताश, निराश न होता नैतिक मुल्ये जपत सामाजिक दायित्वाची जबाबदारी घेवून पुढे पुढे मार्गक्रमण करणे म्हणजे गांधीजी यांच्या विचारांवर मार्गक्रम करणे होय. हा प्रयत्न भवरलालजी जैन यांनी केला आहे. तोच प्रयत्न जैन परिवार देखील करत आहे. पुढच्या पिढीपर्यंत गांधी विचार पोहोचावे यासाठी गांधीतीर्थची निर्मिती केली आहे. गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विविध उपक्रम चालविले जातात. महात्मा गांधी जयंती आणि त्यांचा स्मृतिदिन विशेषत्वाने साजरा केला जातो. ३० जानेवारी २०२१ रोजी महात्मा गांधीजींच्या ७३ व्या स्मृतिदिनी त्यांना भावांजली कार्यक्रमाच्या माध्यमातून आगळी वेगळी श्रद्धांजली दिली जात आहे. लॉकडाऊन नंतरचा हा पहिलाच सार्वजनिक कार्यक्रम होत आहे. त्यामुळे कार्यक्रमास येणार्या सर्वांनी तोंडावर मास्क लावणे आणि सोशल डिस्टेंसिंग राखणे अनिवार्य आहे. या कार्यक्रमास अवश्य उपस्थित रहावे असे आवाहन गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.