दोन्ही कॉंग्रेसने आपल्या वाट्याला अत्यंत महत्त्वाची खाती घेवून आपले पारंपरिक कारभार सुरू ठेवले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी त्यांना थोबाडीत जरी मारली तरी कोणीही सत्ता सोडून जाणार नाही, असे माझा मित्र असलेल्या कॅबिनेट मंत्र्यानेच मला सांगितले आहे, अशी माहिती भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आज दिली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या कोणत्याही धमक्यांना आम्ही घाबरणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कोल्हापुरात माध्यम प्रतिनिधीनींशी चर्चा करताना त्यांनी महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) निशाणा साधला. पाटील म्हणाले, १२ बलुतेदार आणि नव्या १८ क्षेत्रातील असंघटित कामगारांना दरमहा पाच हजार रुपयांची मदत करा, अशी आमची मागणी आहे. यासाठी ५० हजार कोटी लागणार आहेत. आम्ही पुण्यात रिक्षाचालक, शालेय बसेसचे चालक यांना दरमहा काही रुपयांची मदत करतो. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता भाजप कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करुन त्यांच्यावर दबाव टाकण्याचे काम केले जात आहे. जरा मनाविरूद्ध वागले की आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या होतात. कोविड आचारसंहितेचा सोयीनुसार वापर सुरू आहे.
खालच्या कोर्टात दोषारोप सिध्द झाले नाहीत म्हणून भुजबळ आणि राष्ट्रवादी पेढे वाटत आहेत. ढोल बडवत आहे. याचवेळी त्यांची मुंबईतील १०० कोटींची बेनामी इमारत जप्त झाली त्याचे काय असा प्रश्न पाटील यांनी विचारला.
महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून मुंबई आणि पुण्यातील बलात्काराच्या वाढत्या घटना पाहता राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे स्पष्टपणे जाणवते. कोणाला कायद्याचा धाक राहिलेला नाही. बलात्कार करणाऱ्यांना लवकर अटक होत नाही, झाली तर दोन दिवसात जामीन मिळतो. त्यामुळे अशा प्रवृत्तीचे मनोबल वाढले आहे. मुख्यमंत्र्यांनी यावर लक्ष घातले पाहिजे, असे पाटील यांनी सांगितले.
कोल्हापूरच्या शेजारील गावांची मानसिकता पाहून आम्ही प्राधिकरण तयार केले. नंतर आमचे सरकार गेले. परंतू तुमचे सरकार येवून २२ महिने झाले. तुम्ही प्राधिकरणाला आतापर्यंत किती निधी उपलब्ध करुन दिला असा उलट प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला. आंबेओहोळसाठी फडणवीस यांच्याशी भांडून निधी लावून घेतला. परंतू मुश्रीफ यांची वृत्तीच खोटं बोल पण रेटून बोल अशी आहे त्याला काय करणार, असा टोला पाटील यांनी लगावला.