अमरावतीत शिवरायांचा पुन्हा एक पुतळा हटवला, शहरात तणाव

0
107

अमरावती, वृत्तसंस्था । अमरावतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आणखी एक पुतळा हटवण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. दर्यापूर येथे बसवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाने हटवत कारवाई केली आहे. शिवसेनेकडून हा पुतळा बसवण्यात आला होता. याआधी शहरातील राजापेठ उड्डाणपुलावर अनधिकृतरित्या बसविलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढून टाकल्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

अमरावतीच्या दर्यापूरमध्ये परवानगी नसतानाही छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यात आला होता. शिवसेना तालुका प्रमुख गोपाल पाटील अरबट यांनी दर्यापूरमध्ये पेट्रोलपंप चौकात विनापरवाना शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता. यानंतर मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास दर्यापूर पोलीस आणि नगरपालिका प्रशासनानं पुतळा हटवण्याची कारवाई केली.

आमदार रवी राणा यांनी राजापेठ उड्डाणपुलावर विनापरवाना बसवलेला शिवरायांचा पुतळा हटवल्यानंतर प्रशासनाने दर्यापूरमधील पुतळा हटवण्याची तयारी सुरु झाली होती. हा पुतळा काढू नये यासाठी सर्वपक्षीयांच्या वतीने पोलिसांना निवेदन देण्यात आलं होतं. तसंच अनेक शेकडो कार्यकर्ते या मागणीसाठी चढले पाण्याच्या टाकीवर चढले होते. मात्र मध्यरात्री नगरपालिका आणि पोलिसांनी हा पुतळा हटवला. यामुळे दर्यापूरमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

खासदार नवनीत राणांची ठाकरे सरकारविरोधात घोषणाबाजी
राजमाता जिजाऊ यांच्या जन्मदिनी विनापरवानगी आमदार रवी राणा यांनी राजापेठ उड्डाणपुलावर पुतळा बसवला होता. हा पुतळा अनधिकृतरित्या बसवण्यात आल्याचं कारण सांगत पोलिसांनी पहाटे हटवला. त्यानंतर शहरातील वातावरण तापलं होतं. त्यानंतर आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांना त्यांच्या शंकरनगर येथील निवासस्थानी पोलिसांनी स्थानबद्ध केलं होतं. त्यामुळे युवा स्वाभिमान संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने त्यांच्या घरासमोर जमले होते. युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी कुठलीही गडबड करू नये आणि शहरातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये, यासाठी त्यांच्या घराबाहेर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. आमदार राणा यांच्या घरालगत दोन्ही बाजूने बॅरिकेट्स लावण्यात आले होते.

“आमचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवून ठाकरे सरकारने त्यांची हुकुमशाही वृत्ती दाखवली आहे. दहशतवादी असल्यासारखं खासदार आणि आमदारांना स्थानबद्ध केलं जातंय. आमच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय. अशा प्रकारे ठाकरे सरकार छत्रपतींचा अपमान करतंय,” असा आरोप आमदार रवी राणा यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here