जळगाव : प्रतिनिधी
जिल्ह्यातील महामार्गावर होणार्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी अपघाती क्षेत्रांची माहिती संकलीत करुन त्याठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशा सूचना खासदार रक्षा खडसे यांनी दिले.
जिल्हा नियोजन भवनात संसद सदस्य रस्ता सुरक्षा समितीची बैठक खासदार खडसे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार संजय सावकारे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे आदी उपस्थित होते.
खासदार खडसे पुढे म्हणाल्या की, सध्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात महामार्गाची कामे सुरु आहे. त्यामुळे वाहनचालकांना मार्गदर्शक ठरतील असे सुचना फलक ठिकठिकाणी लावावे. ज्याठिकाणी वारंवार अपघात होतात अशा ठिकाणांची माहिती तातडीने संकलीत करुन तेथे आवश्यक त्या उपाययोजना राबवाव्यात. घोडसगाव येथे सर्व्हिसरोड तयार करण्याच्या सुचना देऊन महामार्गाच्या कामांची गती वाढविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. बहुतांश अपघात हे वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे किंवा त्याचे गार्ंभीर्य लक्षात न घेतल्याने होत असतात. यात दुचाकी धारकांची संख्या जास्त असल्याने दुचाकीला साईड मिरर आवश्यक करावा, यंत्रणांनी वाहतुक नियमांची प्रभावी अंमलबजावणी करावी. यावेळी खा. खडसे यांनी जळगाव-चिखली, जळगाव-धुळे, जळगाव-औरंगाबाद, बर्हाणपूर-अंकलेश्वर या राष्ट्रीय महामार्गाच्या कामांची सद्यस्थितीचा माहिती सर्व संबंधित यंत्रणांकडून जाणून घेतली.
आ. सावकारे यांनी केल्या विविध मागण्या
वाहनांची नोंदणी करतांना कोणी बोगस कागदपत्रे तर सादर करीत नाही ना, याची खात्री विभागाने करावी. रिक्षांमध्ये वाढीव प्रवाशांंची होणारी वाहतुक अपघाताला निमंत्रण देत असल्याने त्याचीही तपासणी व्हावी. रसत्यांवर वाहनाच्या गतीबाबतचे फलक लावावे, भुसावळ येथील रुग्णालयात ऑक्सिजन टँक, पोस्टमार्टम रुम उभारावी, रुग्णालयाला वॉलकम्पाऊंड करण्याची मागणी आमदार संजय सावकारे यांनी केली तसेच आमदार निधीतून एक ऍम्बुलन्सही देण्याची मागणी त्यांनी बैठकीत केली.
समितीचे सदस्य सचिव जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी वाहतूक नियमांचे महत्व संबंधित यंत्रणांनी सर्व नागरिकांना समजविताना नियमांचे पालन केल्याने जिवीत तसेच वित्तीय हानी टाळता येवू शकते याचे समाज प्रबोधन करण्यासाठी मार्गदर्शकाची भूमिका बजावावी. वाहन चालवितांना हेल्मेट, सिटबेल्टाचा वापर करण्याच्या सुचना देतांनाच महामार्गावर माहिती फलक तातडीने लावण्याच्या सुचना दिल्या. त्याचबरोबर वाहतुक नियमांचे उल्लंघन करणार्यांवर पोलीस विभागामार्फत कठोर कारवाईची मोहिम राबविण्यात येत असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ मुंढे यांनी सांगितले.
समिती सदस्य उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी प्रास्ताविकात जिल्ह्यात तरसोद फाटा टीव्ही टॉवर, शिव कॉलनी थांबा, चिंचखेड फाटा, धुळे चाळीसगाव रस्ता या तीन ठिकाणी ब्लॅकस्पॉट निश्चित करण्यात आले आहे. मागीलवर्षी २०१९ मध्ये जिल्ह्यात ८३५ अपघातात ४५४ मृत्यु झाले तर ७७० व्यक्ती जखमी झाले. २०२० मध्ये ७५२ अपघातात ४७१ मुत्यु झाले असून ५१४ व्यक्ती जखमी झाल्या आहेत. मागीलवर्षीपेक्षा अपघातांची संख्या १० टक्क्यांनी कमी झाले असून मृत्युंची संख्या ३.५ टक्के वाढली आहे तर जखमींची संख्या ३३ टक्क्यांंनी घटल्याचे सांगितले. तर वाहतुक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पोलीस विभागाने २०२० मध्ये ८९ वाहने निलंबित केली असून ५ वाहनचालकांचे लायसन्स निलंबित करुन प्रस्ताव परिवहन विभागास पाठविल्याची माहिती शहर वाहतुक शाखेचे पोलीस निरिक्षक देविदास कुणगर यांनी बैठकीत दिली. जिल्ह्यात पारोळा, मुक्ताईनगर, पाचोरा, अंमळनेर, रावेर आदी ठिकाणी ट्रामा केअर सेंटरचा प्रस्ताव असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण यांनी सांगितले.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरु असलेल्या रस्त्यांबाबतची माहिती अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांनी राष्ट्रीय महामार्गांच्या कामाची माहिती प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा आणि धुळेचे अरविंद काळे यांनी दिली. बैठकीस परिवहन, एस.टी, सार्वजनिक बांधकाम विभागासह इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते.