नागपूर : जगातील सर्व प्रश्नांची उत्तरे भारताच्या परंपरेत आहेत. विश्वकल्याणासाठी भारताचे विचार अधिक प्रभावशाली आहेत. विविधतांना जोडणारा घटक हा फक्त भारताजवळच असून तो आम्हास जगाला द्यायचा आहे. जगाचे नेतृत्व करण्यासाठी भारत सक्षम असल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी म्हटलं आहे.
अमेरिका आणि रशियाची दुसऱ्या महायुद्धात झालेली हानी पाहून हे देश आपल्या भूमीवर युद्ध करण्यासाठी इच्छुक नव्हते. त्यामुळे इतर देशांना त्यांनी शस्त्रसाठा पुरवून युद्ध करणं सुरू केलं. यामध्ये अमेरिका जिंकली, महासत्ता झाली; पण जगाला एकत्र ठेवू शकली नाही, असे मोहन भागवत म्हणाले.
‘जागतिक परिप्रेक्ष्यात भारताची भूमिका’ या विषयावर दूरचित्रसंवाद यंत्रणेद्वारे झालेल्या कार्यक्रमात मोहन भागवत बोलत होते.
दरम्यान, इतर देश जगाला बाजार मानतात; पण भारत संपूर्ण विश्वाला एक कुटुंब मानतो. ‘सर्वांना सुख मिळो’, असा भारताचा विचार आहे. यात कुणालाही लहान मानले जाणार नाही, हाच विचार भारताला द्यायचा असल्याचं भागवत यांनी सांगितलं.