जळगाव ः प्रतिनिधी । तालुक्यातील रायपूर येथे शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या घरकूल योजनेसाठी (पंतप्रधान आवास योजना) गरजू लाभार्थ्यांसाठी जाहीर झालेल्या ‘ड’ पत्रक यादीचा सर्व्हे करण्यात आला. यात सर्व्हे करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे सावळा गोंधळ उडाला आहे. यावेळी सर्व्हे करणाऱ्या अधिकाऱ्यांनी काही बोगस लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देवून यादी घोषित केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र, यामुळे खरे लाभार्थी घरकुलापासून वंचित राहिले आहे. याबाबत सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य आणि वंचित लाभार्थ्यांतर्फे पंचायत समितीवर मोर्चा काढण्यात येऊन पं.स.सभापतींना निवेदन देण्यात आले. अधिकाऱ्यांच्या या भोंगळ प्रकारामुळे खऱ्या लाभार्थ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
काही लाभार्थ्यांना पुन्हा दिला घरकुलाचा लाभ खरे लाभार्थी मात्र घरकुलापासून वंचित
निवेदनात म्हटले आहे की, शासनातर्फे गरजू, गरीब, दारिद्रय रेषेखालील आणि निराधार विधवा महिलांना शासनातर्फे घरकूल योजनेचा (पंतप्रधान आवास योजना) लाभ दिला जातो. या घरकूल योजनेसाठी रायपूर येथे 208 लाभार्थ्यांची यादी घोषित करण्यात आली होती. यानंतर या यादिनुसार शासनातर्फे नेमण्यात आलेल्या टिमतर्फे संबंधित लाभार्थ्यांच्या घराचे सर्व्हे करण्यात आले. या सर्वेत टिममधील अधिकाऱ्यांना लाभार्थ्यांनी दिलेली माहिती खरी न दाखविता अधिकाऱ्यांनी खोटी माहिती दाखवून या टिमने सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता आणि विधवा महिला व गरजुंची नावे वगळून घरकूल योजनेत न बसणाऱ्यांची नावे फायनल यादीमध्ये घेतल्याचे तसेच सर्वे करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांनी गावातील काही उपद्रवी व्यक्तींच्या इशाऱ्यावरून ही खोटी यादी प्रसिद्ध केल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे. सर्वे करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभारामुळे खरे लाभार्थी घरकुलाच्या लाभापासून वंचित राहिल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
म्हणून पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी या प्रकरणाकडे लक्ष घालावे व फायनल करण्यात आलेली घरकूल योजनेतील लाभार्थ्यांची यादी रद्द करण्यात यावी. तसेच शासनातर्फे नवीन टिम तयार करून आणि सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या मदतीने परत सर्वे करण्यात येऊन खऱ्या लाभार्थ्यांना घरकूल योजनेचा लाभ द्यावा, अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. समस्या त्वरीत न सुटल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करू, असा इशारा वंचित लाभार्थ्यांंतर्फे निवेदनाव्दारे देण्यात आला आहे.
घरकुलचे सर्व्हे करणाऱ्या अधिकाऱ्यांचे मोबाईल ‘स्वीच ऑफ’
दरम्यान, रायपूर येथे घरकूल योजनेतील फायनल यादी प्रसिद्ध करण्यात आली. घरकूल योजनेसाठी खरे लाभधारक असलेल्या लाभार्थ्यांचे नाव या यादीमध्ये नसल्यामुळे त्यांनी सर्व्हे करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्या अधिकाऱ्यांचे भ्रमणध्वनी ‘स्वीच ऑफ’ दाखवित होते, अशी माहिती ग्रामस्थांतर्फे देण्यात आली.